मंत्रीपदाची आठवण करुन देताना ‘घंट्या’चा उल्लेख; पवारांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापलं, व्हिडिओ व्हायरल..
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील राजकारण अजूनही सुसंस्कृत मानलं जातं. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात तसेच विरोधकांवर टीका करताना देखील महाराष्ट्र पातळी सांभाळत असल्याचे बोललं जाते. मात्र अलीकडच्या काळात हा दर्जा ढासळ्याचं पाहायला मिळतं. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. अजित पवार यांच्या विधानावर आता सर्व स्तरातून टीका करण्यात येत असून, पुन्हा एकदा अजीत पवार अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे.
पुरंदर तालुक्यामधील निंबूत समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित, नुतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार यांनी दत्तामामा भरणे यांना कानपिचक्या काढताना हे वादग्रस्त विधान केलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांना आपल्या पदाची आठवण करुन देताना, निधी वाटपावरून अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. मात्र बोलण्याच्या ओघात त्यांच्या तोंडून एक वादग्रस्त विधान देखील निघाल्याचे पाहायला मिळाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी आपल्या विभागातून सर्वाधिक निधी हा इंदापूर तालुक्याला दिला असल्याची आठवण करून देताना, अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. तुम्ही फक्त इंदापूर तालुक्यातील राज्यमंत्री नाही, तर संपूर्ण राज्याचे राज्यमंत्री आहात. निधी वाटप करताना, तुम्ही बारामतीला निधी देत चला. बारामतीला निधी द्या म्हणून तुम्हाला आता आम्हाला विनंती करावी लागत आहे.
लक्षात ठेवा जरी तुमच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाव्या असल्या, तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. मी निधी देतोय म्हणून, तुम्ही तुमच्या तालुक्याला निधी देतात, मी जर तिजोरीच्या चाव्याच उघडल्या नाही, तर तुम्ही काय ‘घंटा’ देणार का? असं वादग्रस्त विधान अजित पवार यांनी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विशेष म्हणजे ,आपण चुकीचे बोलतो आहोत, याची जाणीव देखील अजित पवारांना झाल्यानंतर, त्यांनी आता गाडी रुळावरून घसरायला लागली, त्यामुळे आता थांबतो, असंही अजित पवार म्हणाले. यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील झाला आहे.
तसेच यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मी मुंबईत गेल्यावर देखील तुमच्याकडे निधी देण्याचे काम करेल, याविषयी अजिबात शंका बाळगण्याचे कारण नाही. मी वाढत्या उंचीचा असल्यामुळे, आपल्या लोकांच्या ताटामध्ये एक पळी जास्तच पडणार आहे. असा देखील भेदभाव करणारं विधान अजित पवार यांनी केल्याचे, यावेळी पाहायला मिळालं. मी निधी वाटप करताना इतर ठिकाणी देखील देईन, मात्र बारामती आणि निंबूला निधी वाटप करताना एक पळी जास्त वाढेल, असे देखील विधान अजित पवार यांनी केल्याने, आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांची वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अजित पवार यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. वादग्रस्त विधानानंतर अजित पवार यांना आत्मक्लेष करायला लागल्याची घटना देखील महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाही. उजनी पाण्यासंदर्भात देशमुख नावाचे व्यक्ती उपोषणाला बसल्यानंतर, अजित पवार यांनी धरणात पाणीच नाही तर मी काय ** काय? असंही वादग्रस्त विधान केलं होतं.
पवार यांना या विधानामुळे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढेच नाही तर यशवंतराव चव्हाण संगमावर जाऊन आत्मक्लेष देखील करावं लागलं होतं. एवढेच नाही तर लाईट गेल्यामुळे पोरांची संख्या वाढत असल्याचं माझ्या लक्षात आल्याचं देखील वादग्रस्त विधान अजित पवार यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर असा पहा फेरफार उतारा अगदी सोप्या भाषेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम