‘या’ साडे तीन लोकांना संजय राऊत ‘जेल’मध्ये टाकणार; नावं समोर आल्याने खळबळ
काही महिन्यांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपच्या रडारवर असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात तिन्हीं पक्षांला एकत्र आणत, महा विकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांचा महत्त्वाचा वाटा होता, आणि म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप भाजपवर अनेकांकडून करण्यात येतोय. मात्र आता शिवसेनेला जाणून बुजून टार्गेट केले जात असल्याने, संजय राऊत यांनी देखील दंड थोपटले असून, भाजपची साडेतीन लोकं आता जेलमध्ये जाणार असल्याचं विधान करत खळबळ माजवून दिली आहे.
भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ असं भाजपने नाव दिलेल्या किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत खळबळ उडवून दिली. संजय राऊत यांचे कुटुंबीय देखील भष्टाचारात सामील असल्याचे सोमय्या यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर त्यांनी जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, याविषयी संजय राऊत यांच्यावर तक्रार दाखल करावी. असं म्हणत शिवाजी नगर पोलीस स्टेशनही गाठलं होतं.
किरीट सोमय्या हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर, आणि ठाकरे कुटुंबावर देखील विविध आरोप करत आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन शिवसेना देखील आता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आज शिवसेना भवन येथे महाविकास आघाडी सरकारच्या वतीने, पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना नक्की काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना भवन येथे आज दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत शिवसेना नक्की काय बोलणार, याविषयी संजय राऊत यांनी थोडीशी झलक दाखवली आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजप जाणून-बुजून शिवसेनेला आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करत आहे. या संदर्भात ही पत्रकार परिषदेत असणार असल्याचे संकेत त्यांनी यापूर्वीच दिले आहेत. “हमाम में सब नंगे है” असं म्हणत, संजय राऊत यांनी भाजपची साडेतीन लोकं जेलमध्ये जाणार असंही विधान केलं आहे.
संजय राऊत यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात आता ही साडेतीन लोकं कोण आहेत? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेकांनी आपापली मतं नोंदवली आहेत. मात्र शिवसेनेकडून अद्याप ‘जेल’मध्ये जाणारी साडेतीन लोकं कोण आहेत? याविषयी स्पष्टीकरण आलेला नसून, आज पत्रकार परिषदेत याचा उलगडा होऊ शकतो, असंही बोललं जातं आहे.
संजय राऊत यांनी भाजपचे साडे तीन लोकं जेलमध्ये जाणार आहेत. हे जे विधान केलं आहे, यावरून असं लक्षात येतं की, तीन लोकांविषयी काही माहित नाही, मात्र हा जो अर्धा लोकं आहे, तो नक्कीच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आहेत.असं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या संदर्भात चौकशी सुरू आहे. आणि म्हणून कदाचित या हल्ल्यात नितेश राणे हे मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. आणि त्यामुळेच या साडेतीन लोकांपैकी अर्धा लोकं हा नितेश राणे असण्याचा अंदाज अनेकांनी लावल्याचं पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम