रस्ते, तलाव इत्यादी कामांपेक्षा वागणे-बोलणे आणि व्यवहारावर पुढाऱ्यांना मते मिळत असतात: दानवे
अनेक लोकांना राजकारणामध्ये यावे असे वाटते. परंतु राजकारण हे सर्वात अवघड असे क्षेत्र आहे. रस्ते, तलाव इत्यादी कामांपेक्षा वागणे-बोलणे आणि व्यवहारावर पुढाऱ्यांना मते मिळत असतात. याबाबत जनतेचे लक्ष असते आणि जर काही चुकले तर जनता त्याला कधी जागा दाखवून देईल हेही सांगता येत नाही, अशा शब्दांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे आपल्या अनुभवाचे काही संदर्भ देत राजकारणावर चौफेर टोलेबाजी केली.
प्रा. दिलीप अर्जुने यांच्यावरील ‘संघर्षदीप’ गौरव या ग्रंथाचे प्रकाशन करताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अंकुशराव टोपे यांचा उल्लेख करून त्यांनी मला ‘तुम्ही नेहमी निवडून कसे येता,’ असा प्रश्न केला. तसेच याबाबत राजेश टोपे यांना यांना माझ्याकडून शिकण्यास सांगितले.
या भेटीच्या वेळी आणि पिंप्रीराजा येथे झालेल्या एका जाहीर सभेमध्ये मी दिवंगत नेते अंकुशराव टोपे सांगितले की, रस्ता व तळ्यांची कामे केल्याने मते मिळत नाहीत, तर सत्तर टक्के मत तुमचे बोलणे, वागणे आणि व्यवहारावरून मिळतात.
करोना विषाणू संसर्गाचा काळ असल्यामुळे परभणी येथील एका कार्यक्रमामध्ये दहा वक्त्यांनंतर भाषणासाठी उभे राहिल्यावर अगोदर मी माईकला कापड गुंडाळले होते. जिवाची भीती ही सर्वांनाच असते. परंतु वृत्तवाहिन्यांनी दिवसभर तेच दाखविले. कॅमेऱ्यांमुळे बोलणे अवघड झाले आहे. थोडेसे काही बोलले गेले की लगेच मागचे-पुढचे न दाखविता तेच दाखवित राहतात, असेही दानवे म्हणाले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम