धनंजय मुंडें यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले
बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडें यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान यावरुन चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. “महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्या भयानक गोष्टीला देखील कसे बाजूला ढकलता येईल आणि आपण कसे निर्दोष आहोत हे दाखवण्याचा जो काही या लोकांचा प्रय़त्न आहे तो अत्यंत निंदनीय असा आहे,” अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.
“ धनंजय मुंडें यांच्या बाबतीमध्ये जी घटना घडली त्यामध्ये भाजपाने सुरुवातीपासूनच तक्रार खरी की खोटी असल्याचं ठरवून मग निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. परंतु वारंवार आम्ही रेणू शर्मा व्यतिरिक्त पीडिता करुणा शर्मा यांच्याबद्दल बोला असं सांगत होतो. धनंजय मुंडे यांनी आपले संबंध असल्याचे आणि या संबंधातून मुल असल्याचं आणि प्रतिज्ञापत्रात दोन्ही मुलं दाखवली नाहीत हेदेखील मान्य केलं. हे सर्व अनैतिक आहे आणि कायदेशीर नाही. त्यामुळे आम्ही मुंडे यांचा राजीनामा मागितला होता,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुढे बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘”परंतु रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली आहे म्हणजे ते निर्दोष आहेत, बदनामी झाली असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे काय चाललंय काय? महाराष्ट्रातील नैतिकता संपली आहे का?”.
“मी पत्रकार परिषदेमध्ये ११ उदाहरणं दिली होती. तुमच्यावरती कोणी आरोप केले नाहीत तर तुम्ही शरिरसंबंध होते हे मान्य करत आहात. हे भारतीय परंपरेमध्ये बसतं का? हिदू कायद्यामध्ये दोन बायकांना परवानही आहे काय? मुल न दाखवण्यालाही परवानही आहे काय? तक्रार मागे घेतली म्हणजे जणू काही क्लीन चीट मिळाली असे ढोल वाजवले जात आहेत,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. तक्रारदार महिलेला तक्रार मागे घेण्यासाठी दबाब होता का? याची देखील माहिती पोलिसांनी घेतली पाहिजे असं सांगत असताना हे जे काही चालले आहे ते महाराष्ट्राच्या परंपरेला घातक आहे असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.