राज्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले; नागरिकांना सत्ता बदलण्याची सुवर्णसंधी

सात हजार १३० रिक्त जागांसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान

0

देशाच्या विकासाचा गाभा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोट निवडणुकांचे बिगुल आता वाजले असून, राज्यातल्या एकूण 34 जिल्ह्यातील ४ हजार पाचशे ३४ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. ४ हजार पाचशे ३४ ग्रामपंचायती मधून एकूण ७ हजार १३० रिक्त जागा झाल्या असून, या जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असल्याची माहिती, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मिळते.

प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केल्याने, उदाहरणार्थ तीन ‘अपत्य’ असून देखील प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवली असल्याच्या कारणावरून रिक्त झालेली पदे, निधन, राजीनामा, अशा विविध कारणासाठी रिक्त झालेल्या जागांसाठी इच्छुक उमेदवारांना ३० नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक आयोगाने कोरोना तसेच निवडणूक यासंबंधी काही नियमावली देखील जिल्हाधिकाऱ्यांना घालून दिल्याची माहिती मिळतेय. यामध्ये ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या पोटनिवडणूका या नेहमीप्रमाणेच घेण्यात याव्यात, अशाही सूचनांचा सहभाग आहे.

आरक्षणाबाबत देखील निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. जर मागास प्रवर्गातील रिक्त जागा भरायच्या असतील तर, ग्रामपंचायतीतले आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवावं लागणार आहे. आरक्षण मर्यादा ठरवत असताना, ग्रामपंचायतमध्ये एकूण सदस्य संख्या विचारात घेऊनच निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्याचं, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे म्हटले आहे.

खेडेगावात सर्वसामान्यांना सर्वात जास्त उत्सुकता असते, ती ग्रामपंचायत निवडणुकीची. ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान होताना पाहायला मिळते. इतर निवडणुकांच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीमध्येच सर्वाधिक टक्के मतदान होताना दिसून येते. यावरून ग्रामपंचायत निवडणुकीचे महत्त्व किती आहे, हे स्पष्ट होतं. या वर्षात राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींना एकदा मुख्य निवडणूक आणि आता पोटनिवडणूक अशा एकूण दोन वेळेस निवडूकीला सामोरे जावे लागणार असल्याने, नागरिकांना सत्ता बदलाची संधी देखील चालून आली असल्याने, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील एकूण 34 जिल्ह्यातून ४ हजार पाचशे ३४ ग्रामपंचायती मधून एकूण ७ हजार १३० जण आपले नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहेत. ७ हजार १३० रिक्त जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार असून, लगेच दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबरला पोटनिवडणूकीचा निकाल लागणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत ठेवण्यात आली आहे. तर भरलेले अर्ज छाननीची तारीख 7 डिसेंबर या एकाच दिवशी ठेवण्यात आली आहे.

९ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची, मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असणार असून, चिन्ह वाटपाचा कार्यक्रम देखील याच दिवशी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. तसेच २१ डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत एकूण ७ हजार १३० रिक्त जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. काही अडचण आल्यास मतदानाच्या तारखेत बदल करण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार देखील असणार आहे. पोटनिवडणूक जर नियमित वेळेत पार पडली, तर या निवडणुकीची मतमोजणी 22 डिसेंबरला होणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.