यशोगाथा: तीन महिन्यांत कलिंगड आणि खरबूज विक्रीतून तब्बल बारा लाखाचे उत्पन्न; ‘ही’ पद्धत वापरून तुम्हीही होऊ शकता लखपती..
यशोगाथा: शेती व्यवसाय करणे म्हणजे, जुगार पेक्षा कमी नाही, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. बी-बीयाणांपासून ते पिकवलेला माल मार्केटमध्ये गेल्यावरही शेतकऱ्यांची अनेकांकडून लूटमार होते. हे देखील कोणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. साहजीकच यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. नैसर्गिक आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही. मात्र आपल्या शेतमालाची होणारी लूट नक्कीच आपल्या हातात असते. हे शेतकऱ्यांनी वेळीच ओळखलं, तर शेतकरी देखील मालामाल होऊ शकतो. आज आपण याच विषयी बोलणार आहोत.
शेती करायला परवडत नाही, अशी अनेक जण तक्रार करत असतात. यात चुकीचं देखील काहीच नाही. शेती करणं परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र शेती न परवडण्याला देखील आपण स्वतःच जबाबदार आहोत हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. नैसर्गिक आपत्ती पुढे कोणाचाही इलाज नाही. मात्र स्वतःचा माल स्व:ता विकला तर, शेतकरी लखपती होऊ शकतो. हे पुरंदर तालुक्यातल्या मावडी गावच्या बहादर शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलं आहे.
मावडी गावात उच्चशिक्षित पवार कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी शेती मोठ्या मेहनतीने आणि हिमतीने करतात. या उच्चशिक्षित कुटुंबातील विशाल पवार आणि सागर पवार हे दोन सख्खे भाऊ प्रचंड मेहनती आहेत. शिवाय या दोघांचं शेतीशी निगडित असणाऱ्या, बीएससी या क्षेत्रातून शिक्षण झाले आहे. साहजीकच या दोघांना शेती करण्याची आवड निर्माण झाली. हे दोघेही तरुण शेती करत-करत आसपासच्या अनेक शेतकऱ्यांना देखील शेतीविषयक मार्गदर्शन करतात.
तसं पाहायला गेलं, तर पवार कुटुंबियांना जेमतेम एक एकर शेती,तीही वडिलोपार्जित मिळालेली. मात्र एक एकर शेती देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देऊ शकते, हे या पवार कुटुंबाने सिद्ध करून दाखवलं आहे. आणि समाजातील इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. गेल्या चार वर्षापासून हे पवार कुटुंब खरबूज आणि कलिंगडाचेची शेती करत आहे. कलिंगड आणि खरबूज उत्पादनातून या पवार कुटुंबाला उत्पन्न देखील ठीक-ठाक मिळायचे. मात्र गेल्या वर्षी कलिंगड आणि खरबूजाचा तोडा ऐन भरात आला असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. आणि पवार कुटुंबाचा तोंडचा घास हिरावून घेतला.
आपला माल स्वतः विकल्यास अधिक उत्पन्न मिळू शकतं हे लक्षात आलं
कोरोनामुळे लॉक डाउन लागल्याने पवार कुटुंबीयांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागला. मात्र कुटुंबाने हार मानली नाही, आणि रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून कलिंगडाची विक्री केली. बाजारपेठा बंद असल्याने नाईलाजाने त्यांना आपला माल स्वतः विकावा लागला. मात्र त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपण स्वतः आपला माल विकल्यानंतर, आपल्याला चांगले पैसे मिळत आहेत. कलिंगड खरेदी करण्यासाठी लोकांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याने पवार कुटुंबाने आता आपण स्टॉल टाकूनच आपला माल विकायचं ठरवलं.
आपण पिकवलेला माल स्वतःच विकल्यानंतर मार्केट पेक्षाही जास्त पैसे मिळतात, ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, पवार कुटुबाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. आपण स्वतः माल विकल्यानंतर, आपल्याला अधिक पैसे मिळतात. ही गोष्ट लक्षात आली आणि म्हणून पवार कुटुंबाने आपल्या शेजारच्या एका शेतकऱ्याची तीन एकर शेती देखील भाडेतत्त्वावर कसायला घेतली. विशेष म्हणजे, या तीन आणि आपल्याकडे असणाऱ्या एका एकरात कलिंगड आणि खरबूजची लागवड केली. आणि आपल्या शेतातला माल बारामती मोरगाव रस्त्यावर स्टॉल टाकून संपूर्ण कुटुंबाने विकायला सुरुवात केली.
या कुटुंबाने यावर्षी कलिंगड आणि खरबूजाचे तब्बल 70 टन उत्पन्न घेतले. खरबूज 30 ते 40 रुपये किलो, तर कलिंगड 25 ते 30 रुपये किलो, दराप्रमाणे विकलं जात असून, हे कुटुंब गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या बांधावरच कलिंगड आणि खरबूज विकत आहे. आपला माल स्वतः आपणच विकल्याने पवार कुटुंबाला तब्बल 12 लाख रुपये कमवण्यात यश आले. लागवड, औषधी फवारणी यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. उर्वरित नऊ लाख रुपये निव्वळ नफा राहिला. विशेष म्हणजे, हा नफा केवळ तीन महिन्यांत मिळाला असल्याने, आसपासच्या अनेक शेतकऱ्यांसाठी या कुटुंबाने आदर्श घालून दिला आहे.
हे देखील वाचा Wheat growers farmer: गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले मोदी सरकार; आता गहू कवडीमोल भावाने विकला जाणार हे आहे कारण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम