दानवेंच्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेस पोहोचली दानवेंच्या घरी; पुढे काय झाले? वाचा सविस्तर!

पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी गेल्या अडीच आठवड्यांपासून कडक थंडीमध्ये सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असून जगभरातून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी, बीजेपीच्या काही बड्या नेत्यांनी या आंदोलनाविषयी काही अजब वक्तव्य देखील केली आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तान मदत करत असल्याचा दावा केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर टिकेची झोड उडाली. या प्रकरणात आता महाराष्ट्रातील युवक काँग्रेसने उडी घेत,दानवे यांनी केलेल्या विधानाची दखल घेतली आहे.

दानवेंनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या अजब विधानाचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्रातील युवक काँग्रेस,दानवे यांच्या घरी जाणार असल्याची माहिती स्वतः महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना दिली होती.

शेतकऱ्यांविषयी दानवे यांनी केलेल्या विधानाचा जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज दानवे यांच्या घरी देखील पोहोचले,मात्र दानवे भेटले नाहीत. दानवे यांनी केलेल्या विधानामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी,दानवे यांच्या घरासमोर ‘कसं काय पाटील बरं हाय का? काल काय बोलले ते खरं हाय का?’ अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. त्याचबरोबर ‘रावसाहेब दानवे माफी मागा’ अशा आशयाचे पोस्टर घेऊन त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

महाराष्ट्रमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना, यापूर्वीदेखील ‘रावसाहेब दानवे’ यांनी शेतकऱ्यांना ‘साले’असं संबोधलं होतं. यानंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते. दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ संबोधल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. नंतर दानवे यांनी हे वक्तव्य मागे घेत,माफी मागितली होती.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.