भाजी विक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आक्रमक
भाजी विक्रेत्यांच्या हक्कासाठी शिवसेनेकडून सहायक आयुक्तांना निवेदन
औंध| सध्या सर्वच ठिकाणी आठवडे बाजारांचे पेव फुटल्याने पालिकेला कर भरणाऱ्या औंध मंडईतील अधिकृत भाजी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. अनेकांनी तर आपले गाळे बंद केले आहेत.भाजी मंडई संदर्भात औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांची भेट घेऊन शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन भाजी विक्रेत्यांच्या समस्या मांडण्यात आल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून औंधच्या मध्यवर्ती भागात असलेली भाजी मंडई सध्या आठवडे बाजारामुळे दुर्लक्षित होत आहे. ग्राहक सहसा इकडे फिरकेनासा झाल्याने अधिकृत भाजी विक्रेत्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या भाजी मंडईत ५४ गाळे असून व्यवसाय होत नसल्याने अनेक गाळेधारकांनी आपला भाजी विक्रीचा व्यवसाय बंद केला असून केवळ आठ गाळे धारक कसे बसे व्यवसाय करत आहेत.
औंध भागात आठवडे बाजारांची संख्या वाढली असून परिसरातील काही ठिकाणी नागरिक अनधिकृतपणे भाजी विकत आहेत. त्यामुळे औंध भाजी मंडईमध्ये भाजी घ्यायला कोणीच जात नाही परिणामी अधिकृत भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पडत आहे. तरी अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी तसेच अधिकृत व्यावसायिकांना न्याय मिळावा यासंदर्भात औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्या सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे सुशिल लोणकर यांच्यासह गाळेधारक विनोद घाडगे,अनिल धायगुडे,महेश नखाते,दीपक मंदने,दीपक कलाटे, धनंजय शेलार,दत्तात्रय धायगुडे,रावसाहेब झुरुंगे, हिराबाई गवळी,आशा पवार, आशा कांबळे, सुनील खताळ, ज्ञानेश्वर खताळ इत्यादी उपस्थित होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम